शहादा, दि. ०६ (प्रतिनिधी) : गेल्या दोन महिन्यांपासून साफसफाईच्या प्रश्नावर पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शहादा शहरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. विशेषतः म्युनिसिपल शाळेतील लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, तातडीने उपाययोजना न केल्यास पालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व प्रेस मारुती परिसरातील रिकाम्या भूखंडावर सांडपाणी साचल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे. दुर्गंधीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. स्थानिक नागरिकांनी सुमारे महिनाभरापूर्वी तक्रार करूनही नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांनी आरोग्य विभाग प्रमुख गोविंद थोरात यांच्याशी चर्चा करून साचलेले पाणी तात्काळ काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र दोन महिने उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
पालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने रहिवाशांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“जर त्वरित साफसफाई करून साचलेले पाणी हटवले नाही, तर पालिकेसमोर आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा श्री शिवछत्रपती ग्रुपचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.










