उरण, दि. ७ : ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असूनही खेळण्यासाठी हक्काची मैदाने नसल्यामुळे त्यांची अवस्था ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ झाल्याची खंत आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केली.
उरण तालुक्यातील कोप्रोली येथे चंद्रशेखर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आयोजित बापूजी देव चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “हे विदारक चित्र बदलण्यासाठी गावोगावच्या तरुणांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवत हक्काच्या मैदानांसाठी लढा उभारला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
सरकारची वक्रदृष्टी उरण व पेण परिसरातील शेतजमिनीवर असल्याचा आरोप करत, तरुणांनी गुरचरण किंवा अन्य उपलब्ध जमिनीवर मैदाने उभारण्याचा पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. “मैदाने अधिकृत करण्यासाठी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. यापूर्वीही अनेक गावांना मैदाने मिळवून दिली आहेत,” असेही घरत यांनी स्पष्ट केले.
‘मी मराठी’ मोठी जुई येथील मैदानावर प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अविनाश ठाकूर, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रशेखर ठाकूर, अमेय पितळे, प्रितेश पाटील, अक्षय कोळी, अनिकेत ठाकूर तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.







