उरण, दि. ७ : महाराष्ट्रातील आगरी-कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या “आगरी व कोळी समाज सेल – महाराष्ट्र प्रदेश”च्या राज्यप्रमुखपदी नवी मुंबई येथील सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकण पट्ट्यात तसेच मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अस्तित्व असलेल्या आगरी-कोळी समाजाला गेल्या काही दशकांत विविध विकास प्रकल्पांमुळे अनेक शासकीय, शैक्षणिक, रोजगार व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे शासन स्तरावर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी या सेलची स्थापना करण्यात आली आहे.
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते तसेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
निलेश पाटील हे आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून समाजकार्याची जाणीव असलेले, उच्चशिक्षित व सक्रिय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावी काम होईल आणि पक्षाची तसेच समाजाची प्रतिमा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







