ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला मंगळवारी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) लाँचिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुना अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणेकर असल्याने ते टीबीएमवर नजर ठेवतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
टिकुजिनीवाडी ते बोरीवली या दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला टीबीएम मशिनद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी असून त्यामध्ये १०.२५ किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरिवलीकडून ५.७५ किमी आणि ठाण्याकडून सुमारे ६.०९ किमी बोगदा खोदण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या लागणारा ९० मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल.
या बोगद्यात दोन वाहतूक मार्ग असून प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत राबवण्यात येत असून मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुना अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून, तर अर्जुना हे झाडाच्या नावावरून देण्यात आले आहे. एकूण चार अत्याधुनिक आणि मोठ्या व्यासाची टीबीएम यंत्रे या कामासाठी वापरण्यात येणार आहेत. काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
या बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प संवेदनशील असून जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तोडण्यात आलेल्या सुमारे ११ हजार झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले. २०२४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. काही अडथळे आले होते, मात्र ते दूर करून प्रकल्पाला गती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली काम करताना पर्यावरणाची काळजी घेणे मोठे आव्हान होते, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य होत असल्याचेही ते म्हणाले.
या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून गेम चेंजर प्रकल्प ठरेल. रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी देत असल्याचेही ते म्हणाले.








