शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत द्या ; आंदोलनाचा इशारा
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात अलीकडे करण्यात आलेल्या बदलांमध्ये इतिहास विषयातून चक्क मराठा साम्राज्याचा नकाशाच वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही असा परखड इशारा जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी दिला. शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी, बीड यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांना गुरूवार, दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्वीकारले. सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्य हा केवळ ऐतिहासिक विषय नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाच्या माध्यमातून स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे. मात्र, काही इयत्तांमधून हा नकाशा वगळण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या आकलनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता मराठा महासंघाने व्यक्त केली आहे. शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोड / ई-सामग्री आधारे नकाशाची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, या विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन करून अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सदरील निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आदिनाथ पिंगळे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मराठा साम्राज्य हा केवळ ऐतिहासिक विषय नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक,
सामाजिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले स्वराज्य हे भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी आणि गौरवशाली पर्व आहे. या इतिहासाचे सुस्पष्ट आकलन विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी नकाशा हा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी घटक आहे. नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याचा भौगोलिक विस्तार, राजकीय प्रभावक्षेत्र, तसेच ऐतिहासिक घडामोडी यांचे सखोल आणि दृश्यात्मक आकलन होते. नकाशा वगळल्यास विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असून, विषयाची सखोलता कमी होऊ शकते. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये दृश्यात्मक शिक्षणाला विशेष महत्त्व असल्याने, अशा घटकांचा समावेश आवश्यक आहे. जरी अभ्यासक्रम सुलभीकरणाचा उद्देश लक्षात घेतला, तरी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटकांचे संक्षिप्तीकरण करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे असे ही जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी सांगितले.
=======










