जामखेड (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचा दर ५१.४३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून ठेवींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी सभासदांनी कर्जफेडीबाबत दाखवलेली जबाबदारी कौतुकास्पद असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिली.
जिल्हा बँक आशिया खंडात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जात असून ही ओळख अधिक भक्कम करण्यासाठी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष व संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. खातेदारांच्या विश्वासामुळे मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींनी विक्रमी ११,३११ कोटींचा टप्पा पार केला आहे.
बँकेने सोनेतारण कर्ज योजनेत सुधारणा करत प्रतिव्यक्ती कर्ज मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली असून ८ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा सुरू आहे. जामखेड तालुक्यातील पाच शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून अरणगाव शाखेत नव्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
डिजिटल सेवांमध्येही बँक आघाडीवर असून फोन पे, मोबाईल बँकिंग, गुगल पे यांसारख्या सुविधांनंतर आता व्यापाऱ्यांसाठी बारकोड सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमांनुसार सुरू असल्याचेही राळेभात यांनी स्पष्ट केले.
यावेळी रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत, १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन महादेव देडे व सचिव दीपक नेटके यांचा जिल्हा बँकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, अंकुश कोल्हे, नितीन सपकाळ, तालुका विकास अधिकारी दरगुडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.




