राजापूर (प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील हातिवले ते जैतापूर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कित्येक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता सध्या उखडत असून ठिकठिकाणी डांबरासोबत खडी वर येताना दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी केवळ तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, पावसाळा जवळ येत असताना रस्त्याची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या बसथांब्यांनाही भेगा पडू लागल्या असून, त्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसत आहे.
या संपूर्ण परिस्थितीकडे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








