पाथरी (प्रतिनिधी)
पाथरी तालुक्यातील मौजे गुंज, गोंडगाव तसेच डाकुपिंपरी, मंजरथ, मरडसगाव व मुद्गल परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात अखेर आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अर्जदार हय्युम खय्युम खुरेशी यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार १३ एप्रिल २०२६ पासून तहसील कार्यालय, पाथरी समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
संबंधित भागात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करत, केणी, तराफे तसेच यांत्रिक साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या अवैध उपशामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून गोदावरी नदीच्या पात्राचे गंभीर नुकसान होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणीय समतोल बिघडत असून भविष्यात गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी ओव्हरलोड हायवा व टिप्परद्वारे वाळू वाहतूक सुरू असल्याने नागरिक, पशुपक्षी व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघातांची शक्यता वाढल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करणे, ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई, पावत्यांची तपासणी, सीसीटीव्ही व जीपीएस प्रणाली अनिवार्य करणे तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
“प्रशासन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच वाळू माफियांना प्रोत्साहन मिळत आहे,” असा आरोपही करण्यात आला आहे. उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.









