पोंभुर्णा (प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पोंभुर्णा येथील शिवाजी चौकात सामाजिक समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देणारा उपक्रम पार पडला. आदिवासी टायगर सेना पोंभुर्णा व दैनिक नवराष्ट्र निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसाला भात वितरण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. आंबेडकरांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगत, सेवा व समतेचा हा उपक्रम त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी दशरथ कुळमेथे (विदर्भ संघटक), ड्रेफुल आत्राम (जिल्हा अध्यक्ष), विश्वेश्वर मडावी (जिल्हा महासचिव), हेराज सिडाम (जिल्हा संघटक), तसेच इतर सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दैनिक नवराष्ट्र निर्माणचे मुख्य संपादक डी. एस. ख्वाजा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश मेश्राम यांनी केले, तर प्रास्ताविक सचिन मडावी यांनी सादर केले. आभार प्रदर्शन किशोर माहोरकर यांनी केले.
गरजू व सर्वसामान्य नागरिकांना मसाला भाताचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमातून समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देत डॉ. आंबेडकरांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल मेश्राम, खजेंद्र सेमले व आदिवासी टायगर सेना पदाधिकारी तसेच दैनिक नवराष्ट्र निर्माण परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.









