प्रतापपूर (तळोदा) : येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित ‘भव्य हिंदू संमेलन’ दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भगवा चौक परिसरात अत्यंत उत्साहात पार पडले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पारंपरिक पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संमेलनात सामाजिक एकात्मता, संस्कृती जपणे आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत करणे या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आचार्य सुबेदानंदजी महाराज यांची उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना सनातन धर्म, भारतीय परंपरा आणि नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते अॅड. प्रितम मनीषा प्रविण निकम यांनी समाजातील एकजूट, संघटन आणि तरुण पिढीने संस्कृतीशी जोडून राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संमेलनात धार्मिक व सांस्कृतिक विचारांवर आधारित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. समाजातील एकोप्याची भावना दृढ करण्यावर सर्व वक्त्यांनी भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी प्रसाद वितरण करण्यात आले.
सकल हिंदू समाज, प्रतापपूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक व सांस्कृतिक जागृती वाढल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.









