कन्नड (प्रतिनिधी) : भारतरत्न Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. श्याम गुढे यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली.
ते म्हणाले की, जोपर्यंत समाजातील जातिव्यवस्था पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत खरी सामाजिक समता निर्माण होऊ शकत नाही. शासनाकडून आंतरजातीय विवाहासाठी अनुदान दिले जात असले, तरी समाजात एकोपा आणि स्वीकाराची भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. गुढे यांच्या हस्ते चंद्रसेना शेजवळ यांना ‘माता रमाई गौरव पुरस्कार’, शाम मोरे यांना ‘ऊर्जा गौरव पुरस्कार’, तर लातूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोरख सातदीवे यांना ‘संविधान आदर्श प्रशासक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच माणिक आबा पगारे यांना ‘सेवा वृत्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास आमदार संजना जाधव, नगराध्यक्ष फरीन बेगम जावेद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.









