शहादा,दि.15 (का.प्र.)
नंदुरबार जिल्हा काँग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी आणि संघटनेला नवी उभारी देण्यासाठी ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत बुधवारी शहादा येथे भव्य मेळावा उत्साहात पार पडला. गेल्या सहा वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल 24 जणांनी आपली दावेदारी सादर केली असून, लवकरच जिल्ह्याला नवा ‘कॅप्टन’ मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
बालेकिल्ल्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान-
एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असलेला नंदुरबार जिल्हा 2014 नंतर राजकीय स्थित्यंतरामुळे कमकुवत झाला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींपासून गांधी परिवाराचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिले आहे. मात्र, आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त होते. सध्या आमदार शिरीष नाईक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आता ‘संघटन सृजन अभियान’च्या माध्यमातून पक्षाने पुन्हा एकदा बांधणी सुरू केली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन-
शहादा येथील मिरा प्रताप लॉन्स बायपास रस्ता येथे आयोजित या मेळाव्यात प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अखिलेश शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर खालील मान्यवर उपस्थित होते.अनिल पाटील (प्रदेश निरीक्षक व पंचायत राज समन्वयक),शिवाजीराव मोघे (माजी मंत्री),दिलीप नाईक (नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष),राजेंद्र गावित,सुहास नाईक (माजी उपाध्यक्ष, जि.प.),निलेश पाटील (जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष),देवा चौधरी(किसान सेल अध्यक्ष) आणि जावेद फारुख यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपकभाई पटेल यांनी केले.
जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 जण शर्यतीत-
जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी मोठी असून यात अनुभवी आणि युवा चेहऱ्यांचा समावेश आहे. प्रमुख इच्छुकांमध्ये राजेंद्रकुमार गावित, दीपकभाई पटेल, सुहास नाईक, पंडितराव पवार, खंडेराव पवार, सुरेश साळुंखे, दत्तू पवार, सचिन रहासे, विश्वनाथ वळवी, अशोकराव पाटील, राकेश पावरा, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, अशोक वळवी, रोशन गावित, कश्मिरा बोरसे, मोहम्मद अ. सहमद, हारून इस्माईल खान, ऍड. जोमीखान पठाण, दिलीप नाईक, देवाभाई चौधरी आणि निखिल रघुवंशी यांचा समावेश आहे.
पुढील 15 दिवसांत घोषणा?-
मिळालेल्या माहितीनुसार या सर्व इच्छुकांच्या मुलाखती आता दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पार पडणार आहेत. त्यानंतर येत्या 15 दिवसांत जिल्ह्यासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे.









