प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी
: पातूर तालुक्यातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी, गोठे व इतर कामांच्या मंजुरीसाठी अनेक महिने प्रतीक्षा केली असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नसल्याने शेतकरी व मजूर हैराण झाला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच ठोस कार्यवाही केली जात नाही.शेतकर्यांना विहिरी मंजूर करुन देण्यासही टाळाटाळ केल्या जात आहे .तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी, गोठे व इतर कामांसाठी प्रस्ताव सादर करूनही ते प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींवर मर्यादा येत असून आर्थिक अडचणी अधिक तीव्र होत आहेत.
याशिवाय, यापूर्वी मंजूर झालेल्या विहिरींचे जिओ-टॅगिंग देखील अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंजूर कामेही प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाहीत. प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी द्यावी तसेच जिओ-टॅगिंगची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
वंचितच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.अर्चना विष्णू डाबेराव ,मा.उपसभापती ईमरान खान मुमताज खान तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णू डाबेराव यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
एकूणच, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पातूर तालुक्यातील रोजगार हमी योजना ठप्प झाल्याचे चित्र दिसत असून, तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.सर्व शेतकर्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“रोहयो च्या रखडलेल्या कामांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत शेतकर्यांचे प्रश्न निकाली काढुण त्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल “-मा.उपसभापती ईमरान खान मुमताज खान.








