कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर आरटीओ प्रशासन सक्रिय झाले असून नियमभंग करणाऱ्या इको टॅक्सीचालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवस चाललेल्या विशेष मोहिमेत २२ वाहनांवर कारवाई करत सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अलीकडेच रायते पुलाजवळ प्रवाशांनी भरलेल्या इको टॅक्सीची सिमेंट मिक्सरला धडक होऊन ११ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून आरटीओने कठोर भूमिका घेतली आहे.
कारवाईदरम्यान प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून नेणाऱ्या टॅक्सींची तपासणी करण्यात आली. सहा ते सात प्रवाशांची क्षमता असताना १२ पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच टॅक्सीमध्ये बसवण्यात आलेल्या अतिरिक्त सीट्स उखडून टाकण्यात आल्या, अशी माहिती आरटीओ अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.
दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना अद्याप सरकारी मदत न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे.
यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा आरटीओकडून देण्यात आला आहे.










