कणकवली | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या साक्षी सुनील घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भाजपावर टीका केली. “आतापर्यंत आमच्या उमेदवारांवर दबाव टाकून अर्ज माघारी घेण्याचे प्रकार होत होते, मात्र आता भाजपाच्या उमेदवारानेच माघार घेतल्याने त्यांच्या विरोधाची सुरुवात झाली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी साक्षी घाडी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास शिवसेना शाखाप्रमुख संदीप राणे, युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम, सुरज वर्दम, सुनील घाडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या बिनविरोध निवडीमुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










