रिसोड (प्रतिनिधी)
कडाक्याच्या उन्हात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रिसोड शहरातील नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पंखे, कुलर बंद पडल्यामुळे घरात राहणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही मोठा परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.
वीज नसल्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत असून मोटारी बंद राहिल्याने काही भागात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी संबंधित वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.










