पाथरी/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यासह पाथरी परिसरात सध्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून उष्माघाताचा धोका तीव्र झाला आहे. वाढत्या उष्णतेमागे ‘एल निनो’ (El Niño) या जागतिक हवामान प्रक्रियेचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पॅसिफिक महासागरातील तापमानवाढीमुळे वाऱ्यांच्या प्रवाहात बदल होत असून, याचा परिणाम भारतातील हवामानावर होत आहे.
या बदलामुळे पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता असून, मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उष्माघाताचा धोका वाढला
सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि उन्हात काम करणारे मजूर विशेषतः धोक्यात आले आहेत. डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, बेशुद्धावस्था, घाम न येणे व त्वचा कोरडी पडणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.
“रुग्णांसाठी २४ तास तयारी” – डॉ. जनार्दन गोळेगावकर
पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांनी सांगितले की, उष्माघाताच्या रुग्णांसाठी रुग्णालयात २४ तास उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. चार स्वतंत्र बेड, कुलर व आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाचा सल्ला
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत दिवसातून भरपूर पाणी पिणे, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर जाणे टाळणे, सैल व सुती कपडे वापरणे, तसेच ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.
प्राण्यांचीही काळजी घ्या
उष्णतेमुळे रस्त्यावरील प्राणीही त्रस्त होत असून नागरिकांनी त्यांच्या साठी पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असून, सजगता हाच उष्माघातापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.











