पाथरी (प्रतिनिधी)
पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह’ सुरू करण्याच्या मागणीला अखेर प्रशासकीय स्तरावर सकारात्मक गती मिळाली आहे. संकल्प मानव विकास संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत परभणी समाज कल्याण विभागाने संबंधित प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पुणे येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला आहे.
पाथरी व मानवत परिसरात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दरवर्षी ऊसतोडणी हंगामात कुटुंबांसह स्थलांतर करावे लागते. त्यामुळे या कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊन अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शाळा सोडण्याची वेळ येते. या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून पाथरी शहरात शासकीय वसतिगृहाची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर व पदाधिकाऱ्यांनी ३० मार्च २०२६ रोजी सविस्तर निवेदन सादर करून वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय परभणी यांनी अधिकृत पत्राद्वारे संबंधित महामंडळाकडे प्रस्ताव पाठवून पाथरीसाठी वसतिगृह मंजूर करण्याची शिफारस केली आहे.
परभणी जिल्ह्यातील इतर तीन तालुक्यांमध्ये अशा प्रकारची वसतिगृहे कार्यरत असल्याने पाथरी तालुक्याचाही त्यात समावेश व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्थिर शैक्षणिक वातावरण मिळून त्यांच्या शिक्षणात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यात समाधानाचे वातावरण असून, या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संकल्प मानव विकास संस्थेकडून पुढील स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याची आशा व्यक्त होत आहे.











