नांदगाव खंडेश्वर, दि. २१ एप्रिल २०२६ :
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्याला सरसकट पीकविमा लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या भागांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १७,५०० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सरसकट पीकविमा व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संबंधित विमा कंपनीकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा, येत्या काळात या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष मनोज गावंडे, हितेश शेळके, सर्वेश खेडकर, राजेंद्र सावदे, विलास बोबडे, सागर खेडकर, राजेंद्र भिमगडे, वैभव भोयर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.











