पातुर प्रतिनिधी :
पातुर तालुक्यातील आलेगाव येथील नूतन विद्यालयामध्ये दि. १९ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र जैन होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम शर्मा, सचिव बसवेश्वर आप्पा वीर, ज्येष्ठ सदस्य नानासाहेब देशमुख, प्राचार्य व्ही. सी. राठोड आणि पर्यवेक्षक माळी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थी श्लोक निलेश पस्तापुरे तसेच शिक्षक सराफ सर, तीवाले सर, अतालकर सर, थोरात सर, खैरे सर आणि निलेश पस्तापुरे यांनी आपल्या भाषणातून बसवेश्वरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. बसवेश्वर आप्पा वीर यांनी आपल्या मनोगतात अनुभव मंडप, जात-पात निर्मूलन, स्त्री सन्मान आणि सर्वसमावेशक समाजरचना या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य वसंत राठोड यांनी बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा आढावा घेत उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. अध्यक्षांच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगुळकर यांनी केले.










