नागपूर : शहरातील कल्पना नगर-विश्राम नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. १४ व १५ एप्रिल या दोन दिवसीय कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून केक कापण्यात आला. यानंतर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिला व पुरुषांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, लहान मुलांसाठी खेळ व नृत्य स्पर्धा अशा विविध रंगारंग कार्यक्रमांनी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
१५ एप्रिल रोजी जयंती समारोप व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे निवृत्त सचिव दहिवले साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त वनाधिकारी बालचंद्र नाईक व निवृत्त बँक अधिकारी बागडे साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच दहावी सीबीएससी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या मयूर नानोरे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजातील समता, शिक्षण व न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश ढोके यांनी तर आभार प्रदर्शन सौ. संध्या ढोके यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संयोजक गुनिरत्न भंडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी चतुर्भुज भैसारे, जगदीश मेश्राम, रंगारी साहेब, घरडे साहेब, भीमराव रंगारी, घनश्याम सातपुते, बनसोड साहेब यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










