माहूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवक नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप करत निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाने पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माहूर तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक हे सोमवार ते शुक्रवार या नियोजित कामकाजाच्या दिवसांमध्ये गावात हजर राहत नाहीत. काही ग्रामसेवक आठवड्यातून केवळ एकदाच किंवा पंधरा दिवसांतून एक-दोन वेळाच गावात येतात. यामुळे नागरिकांची विविध शासकीय कामे रखडत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः गरीब व गरजू नागरिकांची प्रमाणपत्रे, योजना अर्ज आणि इतर अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांची गैरसोय वाढत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी नियमानुसार आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी आपल्या संबंधित गावात उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामसेवकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनामुळे तालुक्यातील ग्रामपातळीवरील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.










