धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब तालुक्यातील रांजणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच राजाभाऊ आगरकर, उपसरपंच अन्सार शेख, पंचायत समिती सदस्य गणेश पवार, उरूस कमिटी अध्यक्ष शफी उल्ला पटेल, तंटामुक्ती अध्यक्ष मतीन पटेल, बीट आमलदार देशमाने साहेब आदींच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर सजवलेल्या रथातून डॉ. आंबेडकर यांची भव्य मिरवणूक मुख्य चौकातून काढण्यात आली.
या मिरवणुकीत ढोल-ताशे, लेझीम पथक, झांज पथक यांसह चवदार तळे आंदोलनाचे देखावे, भगवान बुद्धांची प्रतिमा आणि महामानवांचा भव्य देखावा हे विशेष आकर्षण ठरले. सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्सवाला एकात्मतेचा रंग दिला.
याशिवाय भाषण स्पर्धा, वाचन स्पर्धा, समाजप्रबोधन कार्यक्रम आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सादरीकरण असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी सोसायटी चेअरमन प्रल्हाद गोरे, व्हाईस चेअरमन वाहेद शेख, ग्रामपंचायत सदस्य मुजम्मिल सय्यद, महारुद्र ढवणे, विकास ईटकर, राहुल सौदागर, शरद गोरे, अकबर सय्यद, असलम पठाण, श्रावण सोनपारखे, अण्णासाहेब सोनपारखे, महादेव गायकवाड, विलास सोनपारखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी जयंती समितीतील भालचंद्र गायकवाड, विजय गायकवाड, माणिक गायकवाड, विकास गायकवाड, धम्मानंद आचार्य, दत्ता बनसोडे आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांच्या सहकार्यामुळे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.










