मुंबई (प्रतिनिधी) – लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच समाजाच्या विविध प्रश्नांना अधोरेखित करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी वसंतस्मृती, भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडणार असून लोहार समाज राज्य स्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्रातील विविध लोहार समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर मंत्री व पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात लोहार समाजाच्या विविध समस्या, विकासाच्या संधी आणि शासकीय योजनांबाबत चर्चा होणार आहे. तसेच समाजाच्या प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या ३२ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन मंत्रिमंडळास सादर करण्यात येणार आहे.
राज्यभरातील लोहार समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










