आजरा (प्रतिनिधी) – आजरा शहरात जुनी इमारत पाडताना घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन निष्पाप जीव गमावल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तसेच संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजरा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
दि. २० एप्रिल २०२६ रोजी आजरा शहरात एका जुन्या इमारतीची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिला प्राध्यापिका आणि एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाला थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. संबंधित इमारत पाडण्यापूर्वी नगरपंचायतीची परवानगी घेतली होती का, कामादरम्यान कंत्राटदाराने आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का, तसेच नगरपंचायतीने देखरेखीत कोणती दक्षता घेतली होती का, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
दोन निष्पाप नागरिकांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांची सखोल चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या वेळी शहरप्रमुख समीर चाँद, सागर नाईक, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, उपतालुका प्रमुख संजय येसादे, अमित गुरव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









