आजरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मौजे कानोली पैकी हारुर येथील दलित वस्तीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषद जिल्हा परिषद कोल्हापूर च्या समाज कल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडले.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेअंतर्गत या कामाची अंमलबजावणी होत आहे. हारुर येथील दलित वस्तीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत आमदार राजेश पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने आता रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या उद्घाटन सोहळ्याला आजरा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अनिल फडके (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), एम. के. देसाई, अभयदादा देसाई, सरपंच सौ. सुषमा पाटील, सदस्य सुधीरकुमार पाटील, सौ. दिपाली सुतार, तसेच विलास सुतार, गणपती कळसकर, सुरेश रेडेकर, सुभाष पाटील, प्रकाश देसाई आणि ग्रामसेवक स्नेहदीप सरदेसाई यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला हारुर व कानोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “वस्तीतील अंतर्गत रस्ते दर्जेदार व्हावेत आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी यावेळी दिले.










