उमरखेड — बाळदी येथील तलाठी कार्यालयाचा प्रश्न आता केवळ दुर्लक्षापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट जनतेच्या हक्कांवर घाला ठरत असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. दि. ५ एप्रिल २०२३ रोजी प्रहार संघटना यांच्याकडून निवेदन देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तत्परतेचा आव आणत कार्यालय परिसराची साफसफाई व वीज व्यवस्था सुरू केली होती. मात्र, ही कारवाई केवळ दिखावा ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तलाठी कार्यालय नियमित सुरू झालेले नसून संबंधित अधिकारी हजर राहत नसल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी भटकंती करावी लागत आहे. सातत्याने निवेदनं, आंदोलनं आणि माध्यमांमधून आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला आहे.
“निवेदनं म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आणि बातम्या म्हणजे केवळ औपचारिकता का?” असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून तलाठी कार्यालय तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.






