मारेगाव — तालुक्यातील मौजा नरसाळा येथे खदानीतील खोल खड्ड्यात पडून एका वृद्ध आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून संबंधित खदान मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
घटना ज्या खदानीच्या हद्दीत घडली, त्या खदान मालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांसह टायगर ग्रुप यांच्याकडून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांनी खदानीतील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. “आज ही घटना घडली, उद्या आणखी कोणाचा बळी जाऊ नये,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशासन नेमकी कधी कारवाई करणार, की प्रकरण दाबले जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






