मारेगाव प्रतिनिधी :
मारेगाव तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याचे दुष्परिणाम आता गुन्हेगारी वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहेत. तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, औद्योगिक विकासाचा अभाव आणि रोजगाराच्या संधींची कमतरता यामुळे अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार राहतात.
या परिस्थितीचा मानसिक परिणाम तरुणांवर होत असून काही जण चुकीच्या मार्गाला लागल्याचे चित्र समोर येत आहे. व्यसनाधीनतेकडे वळणे आणि त्यातून उदरनिर्वाहासाठी किंवा व्यसनाची पूर्तता करण्यासाठी चोरीसारख्या गुन्ह्यांकडे वळण्याचे प्रकार वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यात विविध ठिकाणी चोरीच्या घटना पोलिसांत नोंदवल्या गेल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात कोणत्याही मोठ्या उद्योगधंद्यांचा अभाव असल्याने रोजगार निर्मिती होत नाही, ही मुख्य समस्या असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि विकास आघाडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोजगारनिर्मितीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




