आजरा : प्रतिनिधी
आजच्या समाजात वाढत्या अपप्रवृत्ती, ढोंगीपणा आणि स्वयंघोषित बाबांच्या प्रभावामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत पाखंड खंडनाचे प्रभावी कार्य केवळ वारकरी संप्रदायच करू शकतो, असे प्रतिपादन संत साहित्य अभ्यासक प्रा. शिवाजी भुकेले यांनी केले. शेळप (ता. आजरा) येथे सारथी चॅरिटेबल ट्रस्ट, गडहिंग्लज व समस्त आजरा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. सुनील शिंत्रे यांनी जबाबदारी सांभाळली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वज पूजन, ग्रंथ पूजन व व्यासपीठ पूजनाने करण्यात आली.
प्रा. भुकेले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, काम, क्रोध, लोभ, मत्सर यांसारख्या विकारांवर नियंत्रण मिळवणे हेच खरे कीर्तन आहे. हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचनातून मिळणारे आत्मिक समाधान हेच खरे स्वास्थ्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. सुनील शिंत्रे यांनी बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या संमेलनात सामूहिक हरिपाठ व वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ‘रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक संस्था’तर्फे सादर करण्यात आलेल्या हरिपाठात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता
यावेळी व्यासपीठावर संभाजी पाटील, विमल पाटील, अविनाश शिंदे, सरपंच अर्जुन बागडी, गौरव सुतार, सोमगोंडा देसाई, पार्थ शिंत्रे, पृथ्वी शिंत्रे, मुख्याध्यापक संजय बापट, कृष्ण डाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज पवार यांनी केले, सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. सुनील देसाई यांनी मानले.
“नाचायचे असेल तर कीर्तनात नाचा!”
युवकांना संदेश देताना प्रा. भुकेले म्हणाले की, बेभान होऊन नाचण्यापेक्षा कीर्तनात तल्लीन होऊन सहभागी व्हा. हरी हा केवळ जनात नव्हे तर मनात असावा आणि वारकऱ्यांप्रमाणे समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.








