मुक्ताईनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचण्याऐवजी दलाल आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केला आहे. रावेर, जामनेर, अमळनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील कामगारांना नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यातून आर्थिक शोषण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
माहितीनुसार, कामगारांची नोंदणी दलालांमार्फत केली जात असून प्रत्येकाकडून ₹1000 ते ₹2000 पर्यंत अवैध वसुली केली जाते. याहून गंभीर बाब म्हणजे फॉर्म भरताना मोबाईल क्रमांक, आधार, बँक खाते व वारसांची नावे यामध्ये जाणूनबुजून चुका केल्या जातात. नंतर या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पैसे उकळले जातात. बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही साध्या दुरुस्तीसाठी 5 ते 6 महिने लागतात, तर दलालांना ₹500 ते ₹800 दिल्यास अवघ्या 10 मिनिटांत काम पूर्ण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाने तालुका स्तरावर सुविधा केंद्रे उभारून कर्मचारी नेमले असतानाही कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने त्यांना वारंवार जळगाव येथे फेऱ्या माराव्या लागत आहेत. परिणामी अनेक कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित राहिल्या असून चुकीच्या माहितीमुळे शासकीय योजनांचा लाभ अडकून पडला आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावरच दुरुस्तीचे अधिकार देणे, दलालांविरोधात कठोर कारवाई करणे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणे, प्रक्रियेला निश्चित कालमर्यादा देणे व संपूर्ण यंत्रणा पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत, मंडळाच्या सचिवांच्या निषेधार्थ त्यांच्या खुर्चीला पैशांचा हार घालण्याचाही इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.








