रिसोड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत मजुरांसाठी शासनाने ३० भांड्यांचा स्टील संच मोफत देण्याची योजना सुरू केली असली, तरी वाशिम जिल्ह्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रत्यक्ष भांडी वाटप करण्याऐवजी लाभार्थ्यांना भांड्यांसमोर उभे करून केवळ फोटो काढले जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अनसिंग येथील केंद्रावर ही योजना प्रत्यक्षात राबवली जात आहे की केवळ कागदोपत्री आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या या योजनेत मजुरांची थट्टा होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक लाभार्थ्यांना भांड्यांसोबत उभे करून फोटो घेतले जात असले तरी प्रत्यक्षात साहित्य वाटप होत नसल्याने मजूर रिकाम्या हाताने परतत असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, उन्हाच्या वाढत्या तीव्रतेतही केंद्रावर पिण्याच्या पाण्याची किंवा बसण्याची कोणतीही सोय नसल्याने मजुरांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मजुरी सोडून आलेल्या कामगारांना दिवसभर उपाशीपोटी थांबावे लागत असल्याने प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
साहित्य उपलब्ध असूनही वाटपात टाळाटाळ का केली जात आहे, यामागे कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच मजुरांना त्यांच्या हक्काचा ३० भांड्यांचा संच त्वरित वितरित करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा कामगारांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.







