अतनूर (प्रतिनिधी) : “डंख छोटा असला तरी त्याचा धोका मोठा असतो. हिवतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांसोबतच जनतेचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख यांनी केले. त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती कोळळे यांनीही दुजोरा दिला.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ अतनूर येथे मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर अंतर्गत २८ गावे, वाडी, तांडे व वस्त्यांमध्ये तसेच पाच उपकेंद्रांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. गावातील प्रमुख चौक, बसस्थानक, बाजारपेठ आदी ठिकाणी रॅली काढून नागरिकांना हिवताप (मलेरिया) या आजाराबाबत जागरूक करण्यात आले.
या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्त्या तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला. “मलेरिया डास आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतो,” याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी घराघरात जाऊन साचलेल्या पाण्याची तपासणी केली. ज्या ठिकाणी डासांची अळी आढळली, त्या पाण्यात कीटकनाशक औषध टाकण्यात आले. तसेच नागरिकांना आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता राखणे, साचलेले पाणी टाळणे आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करणे याबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.
या जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, निरोगी समाज घडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.








