दरेगाव (प्रतिनिधी):
दरेगाव येथे उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दररोज सुमारे ५ ते ६ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची गरज वाढलेली असताना विजेअभावी बोअरवेलमधून पाणी काढणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून विजेचा दीर्घकाळ खंड पडत असल्याने उकाड्याचा सामना करणे कठीण जात आहे.
गावकऱ्यांनी संबंधित वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अखंड वीजपुरवठा सुरू केल्यास गावकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








