श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) | दि. २५ एप्रिल २०२६
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या पावन जन्मभूमी श्रीक्षेत्र चौंडी येथून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अहिल्यादेवींनी अठराव्या शतकात नद्या, तलाव आणि विहिरींच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला. पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि जलस्रोतांचे संवर्धन ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा त्यांचा विचार या जलयात्रेचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पवित्र जल आणि माती एकत्रित करत ही यात्रा महेश्वर (मध्य प्रदेश) येथे समारोप होणार आहे.
“विचार… वारसा… विकास” या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमातून पाणी वाचवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी एकनाथ शिंदे, राम शिंदे, रामराव वडकुते, विठ्ठलराव लंघे पाटील, काशिनाथ दाते, अमोल खताळ, डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच वारकरी संप्रदायातील संत-महंत यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
या जलयात्रेमुळे जलसंवर्धनाबाबत जनजागृती होऊन समाजात पर्यावरणपूरक विचारांची रुजवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







