शहादा, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” तसेच नाला खोलीकरण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. विविध धरणे, तलाव आणि नाल्यांमधील साचलेला गाळ काढून जलसाठ्यांची क्षमता वाढविण्याचा व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत भारतीय जैन संघटना (BJS) च्या माध्यमातून जिल्ह्यातील ३३ जलसाठ्यांमधून सुमारे १०.३० लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी सुमारे ६३६.६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांतील विविध लघुपाटबंधारे, पाझर तलाव व गाव तलावांमध्ये गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील ५१ नाल्यांच्या खोलीकरणालाही मंजुरी देण्यात आली असून या कामांतून सुमारे ८.३२ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २९८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे पावसाळ्यात पाणीसाठा वाढून तो अधिक काळ टिकून राहणार आहे. तलाव व नाल्यांमधून काढलेला सुपीक गाळ शेतात टाकल्याने जमिनीची उर्वराशक्ती वाढून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक, विधवा, अपंग तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत असून गाळ वाहतुकीसाठी प्रति एकर १५ हजार रुपये, कमाल ३७,५०० रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच व लोकप्रतिनिधींनी या कामांवर लक्ष ठेवून पारदर्शक अंमलबजावणी करावी तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेत अंतिम अहवाल मंजूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन BJS चे डॉ. कांतीलाल टाटीया यांनी केले आहे. या मोहिमेमुळे जलसंधारणाला चालना मिळून शेतीला बळ मिळेल आणि “चला गाव पाणीदार बनवूया” हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











