शहादा, दि. २६ (प्रतिनिधी) : शहादा तालुक्यातील विविध रस्ते व पुलांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला असताना कामांचा वेग मंदावल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
तालुक्यातील डामरखेडा येथील गोमाई नदीवरील पूल, तिखोरा येथील पूल तसेच वैजाली–नांदर्डे मार्गावरील वाकी नदीवरील पूल ही कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत. काही ठिकाणी पूल जमीनदोस्त अवस्थेत असून, पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना २५ ते ३० किमीचा फेरा मारावा लागत आहे.
शहादा–कहाटूळ, भादे–काथर्दे, पाडळदा–चिखली तसेच तिखोरा–पाडळदा या मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. विद्यार्थ्यांना शाळा–महाविद्यालयात जाण्यास अडचणी येत असून शेतकऱ्यांना बाजारपेठेत माल नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डामरखेडा व तिखोरा येथील पुलांच्या कामाला तीन वर्षांपासून विलंब होत असल्याने ठेकेदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी यापूर्वी आंदोलने करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
प्रशासनाकडून मात्र पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
“ठेकेदारांना कडक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून आहेत,” असे तहसीलदार शहादा यांनी सांगितले.
दरम्यान, प्रवासी महासंघ व स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की, रस्ते व पुलांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या मते, बाजारपेठ गाठण्यासाठी वाढलेले अंतर व वेळेचा अपव्यय हा गंभीर प्रश्न बनला आहे.
सध्या तरी शहादा तालुक्यातील रस्ते व पुलांची स्थिती पाहता आगामी पावसाळा नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.











