पाथरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील शिवाजीनगर, शाहूनगर, नेताजीनगर, ओंकारनगर, शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी वीज बिलांचा १०० टक्के भरणा करूनही सतत वीज खंडित होणे, लो व्होल्टेज आणि अपुरी वीज सेवा यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे सांगितले आहे. पाणीपुरवठा सुरू होताच वीज गायब होण्याची समस्या गंभीर बनली असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरात २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अलोक चौधरी यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोर्चाची सुरुवात शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरातून होणार असून तो बळवंत वाचनालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट महावितरण (MSEB) कार्यालयापर्यंत जाईल. तेथे नागरिकांकडून निवेदन देण्यात येणार आहे.
या बैठकीत नागरिकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पुढील मागण्या समाविष्ट आहेत:
- डीपीवरील वाढता लोड तात्काळ कमी करणे
- सर्व डीपींची क्षमता वाढवणे
- शिवाजीनगर व जाधव डीपी 100 KVA वरून 200 KVA करणे
- शिक्षक कॉलनीतील डीपीची तातडीने देखभाल (मेंटेनन्स) करणे
- बळवंत वाचनालय परिसरात नवीन डीपी बसविणे
- सर्व वीज लाईनवर AB स्विचेस बसविणे
- प्रभाग ३ मध्ये २० नवीन विद्युत पोल उभारणे
- फ्युज कॉलसाठी संपर्क क्रमांक सार्वजनिक करणे
- वीज खंडित झाल्यास राज्य वीज आयोगाच्या नियमानुसार प्रति तास ₹50 नुकसानभरपाई देणे
नागरिकांचे म्हणणे आहे की, वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून, विशेषतः विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि घरगुती कामे अडचणीत येत आहेत.
या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, संपूर्ण प्रभागातील नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“बिल भरूनही सेवा नाही” या तीव्र नाराजीतून नागरिक एकवटले असून, ३० एप्रिलचा मोर्चा महावितरण प्रशासनासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.











