शिवसेना पदाधिकाऱ्यांची जोरदार मागणी
पाथरी (प्रतिनिधी) –
राज्याच्या राजकारणात तळागाळातील प्रश्न जाणणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडलेल्या नेतृत्वाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असताना, शिवसेनेचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांचे नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पुढे येत आहे. त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.
सईद भैय्या खान यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून आरोग्य, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू व वंचित घटकांना मदत केली आहे. “आश्वासनांपेक्षा कृतीला प्राधान्य” ही त्यांची कार्यशैली असून, अनेकांच्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष मार्गी लावल्या आहेत.
त्यांची ‘२४ तास जनतेसाठी उपलब्ध’ अशी ओळख निर्माण झाली असून, कोणत्याही नागरिकाचा प्रश्न असो, तातडीने प्रतिसाद देऊन तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात त्यांचा भक्कम जनसंपर्क तयार झाला आहे.
युवकांच्या रोजगार, शिक्षण आणि मार्गदर्शनाच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. अनेक युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले असून, त्यांना दिशा देण्याचे कार्य केले आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची समन्वयवादी भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद मानली जाते.
पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि जनाधार या बळावर सईद भैय्या खान हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. त्यामुळे विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर त्यांची निवड झाल्यास अल्पसंख्याक, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकडून सईद भैय्या खान यांना विधान परिषदेची उमेदवारी देणे ही काळाची गरज असल्याचे मत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.











