मारेगाव (प्रतिनिधी)
मारेगाव तालुक्यातील भालेवाडी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मारेगाव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी बहुल गावात पाण्यासाठी नागरिकांची रोजची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
तापत्या उन्हात महिलांना व मुलींना डोक्यावर हंडे घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्याअभावी दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी पंचायत समिती मारेगाव येथे जाऊन गटविकास अधिकारी भीमराव वनखंडे यांना निवेदन दिले. अंकुश माफूर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात गावातील पाणीटंचाई तातडीने दूर करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भालेवाडीतील नागरिकांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.









