पातूर (प्रतिनिधी)
पातूर तालुक्यातील नवेगाव येथे वाढत्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून, काही ठिकाणी घरबांधणी, बोरवेल यांसारखी कामेही करण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गावातील प्रमुख रस्ते तसेच अरुंद गल्ल्यांमध्येही अतिक्रमण झाल्याने पाच फुटांचे रस्ते आता दोन फुटांवर आले आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे.
यासोबतच काही अतिक्रमण धारकांकडून ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील वाढते अतिक्रमण रोखण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरत असल्याने आता जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.








