रिसोड (प्रतिनिधी)
अखिल भारतीय गो सम्मान अभियानाच्या अंतर्गत देशभर २७ एप्रिल रोजी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशी गाईंच्या संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर रिसोड येथेही गो सम्मान यात्रा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता सजवलेल्या देशी गाईसह गो सम्मान यात्रा काढण्यात आली. ही यात्रा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना २८८० गोभक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात देशी गाईंच्या संरक्षणासाठी गाईला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देणे, शालेय अभ्यासक्रमात गो विज्ञान विषय अनिवार्य करणे, महामार्गांवर गाईंच्या अपघातांना आळा घालण्यासाठी ‘गो अॅम्बुलन्स’ सेवा सुरू करणे, चारा उपलब्धतेसाठी कायदा करणे तसेच केंद्र सरकारने गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच गाईंची तस्करी व गोहत्या रोखण्यासाठी कडक कायदे करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली.
नारायणी गोशाळा प्रकल्प, मौरगव्हाणचे गजानन कोकाटे, छत्रपती गोशाळा बोरखेडीचे प्रतिनिधी तसेच श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शेकडो गोभक्त या वेळी उपस्थित होते.
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी ते पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.








