(प्रतिनिधी – प्रमोद मडावी)
पुलगाव–विजयगोपाल मार्गावरील तांभा गावासाठी धावणारी ‘लाल परी’ एसटी बस सेवा मागील पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तांभा गावासाठी सकाळी ९.३० वाजता पुलगावहून सुटणारी बस, तसेच १०.३० वाजता गावात पोहोचणारी आणि सायंकाळी ४.३० वाजता सुटणारी व ५.३० वाजता परत येणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तांभा येथून विजयगोपाल हे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असून, ग्रामस्थांना पायी जावे लागत आहे.
रस्ता खराब असल्यामुळे ऑटोचीही सुविधा उपलब्ध नसून, आजारी रुग्णांना नेण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली असता मंगळवारपासून बस सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप सेवा सुरू झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर देवळी-पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी तांभा ग्रामस्थांना दिलासा देऊन तात्काळ बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









