पांढरकवडा (प्रतिनिधी)
राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ पांढरकवडा येथील कृषी सेवा केंद्र चालकांनी सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक व विक्रेता असोसिएशनसह राज्यातील विविध जिल्हा संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीतील विविध समस्यांवर मागील ४ ते ५ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने विक्रेत्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे. खतांच्या पुरवठ्यातील ‘लिंकिंग’ पद्धत बंद करणे, अवैध व अप्रमाणित बियाण्यांवर बंदी, तपासणीतील जबाबदारीत बदल, विक्री मार्जिन वाढविणे तसेच प्रलंबित देयके तात्काळ अदा करणे अशा १२ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे व खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठीच घेतल्याचे विक्रेता संघटनेने स्पष्ट केले आहे.
शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी केळापूर तालुका कृषी निविष्ठा असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ मिलमिले, सचिव किशोर देशटीवार, उपाध्यक्ष राजेंद्र कांडुरवार, नितीन इंगोले, सुशील कैलास्वार, आशिष कानर्तीवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.









