शहादा, दि.२८ (प्रतिनिधी)
पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील साखर कारखान्याची दूषित मळी वाहणारी पाटचारी बेकायदेशीरपणे बुजविणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करावी व भराव तात्काळ हटवावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रश्नावर तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, पुरुषोत्तमनगर येथील साखर कारखान्यातील दूषित मळीची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्यापासून मोहिदा शिवारापर्यंत पाटचारी तयार करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी मोहिदा परिसरातील सर्वे क्रमांक ५९२ जवळ एका विकासकाने कोणतीही परवानगी न घेता सुमारे १५० ते २०० मीटर लांबीचा मातीचा भराव टाकून ही पाटचारी बुजवली आहे.
या प्रकारामुळे पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, आदिनाथनगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार नगर, छोरीया टाऊन आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूषित मळी साचून राहिल्याने भूगर्भातील पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधित विकासकावर कठोर कायदेशीर पावले उचलावीत व पाटचारीवरील भराव हटवून मळीचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन व संबंधित विकासक जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शहादा प्रांत कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार जगदीश चखणे यांनी तक्रार स्वीकारून तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. या निवेदनावर डॉ. राजेंद्र पेंढारकर, महेश पाटील, हितेंद्र वर्मा, रमण नवले, बाबुराव चोंगडे, रेहम ठाकरे, जगदीश ठाकरे आदींच्या सह्या आहेत.








