परतूर दि.२७ एप्रिल २०२६– परतूर तालुक्यातील गो सन्मान अभियानाने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देत गाईला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी केली. या मोहिमेत श्री महादेव मंदिर मोंढा ते तहसील कार्यालय परतूरपर्यंत मोठ्या संख्येने माता, भगिनी आणि बांधव उपस्थित होते यामध्ये नंदी महाराज आणि गोमातेच्या नेतृत्वात देशभरात साधुसंत महंत यांच्या मार्गदर्शनाखाली‘गो सन्मान अभियान’ने विशेष उत्साह निर्माण केला आहे. या मोहिमेचा उद्देश गाईच्या महत्त्वाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता देणे, गोहत्या पूर्णपणे बंद करणे आणि गाईंच्या रक्षणासाठी समाजाचे जागृतीकरण करणे हा आहे.
मोहिमेत अनेक नागरिक, सामाजिक संघटना, विद्यार्थी, कृषक आणि धर्माभिमानी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण देशात विविध कार्यक्रम, शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवून गाईच्या पावित्र्याबाबत जनमानस जागृत करण्यावर भर देण्यात आला.
मोहीमेची प्रमुख उद्दिष्टे:
गोहत्या बंदी: देशात गाईंची हत्या पूर्णपणे थांबवणे.
राष्ट्रीय दर्जा: गाईला ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता देणे.
स्वतंत्र मंत्रालय: गोसेवेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय आणि कडक कायदे असणे आवश्यक.
गो-आधारित शेती: रासायनिक शेतीच्या तुलनेत गो-आधारित शेतीला प्रोत्साहन देणे आणि पंचगव्य उत्पादनांचा प्रसार करणे.
परतूर तालुक्यातील संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्माभिमानी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेला प्रोत्साहन दिले. मोहिमेच्या माध्यमातून गाईच्या रक्षणासह राष्ट्रीय संस्कृती आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेचा संदेश दिला गेला सकल हिंदू बांधव भगिनी यांची मोठी संख्या होती.








