पेण (प्रतिनिधी) – पेण तालुक्यातील दिव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दिवबेडी परिसरात वीजतारा अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तारा इतक्या खाली झुकलेल्या अवस्थेत आहेत की, त्याखालून जाताना लहान मुलांच्या डोक्यालाही स्पर्श होऊ शकतो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, श्री. निवृत्ती दत्तात्रेय ठाकूर यांच्या घरासमोर तसेच कै. हरीभाऊ गुरुजी यांच्या घरामागील पोलवरील वीजतारा धोकादायक अवस्थेत आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“इतकी गंभीर बाब असूनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही, हे आश्चर्यकारक आहे. एखादा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून संबंधित वीजतारा दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.








