पाथरी (प्रतिनिधी):
शहरातील प्रभाग क्र. ३ मधील सततच्या वीज समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) विरोधात भव्य मोर्चा काढला.
शिवाजीनगर, शाहू नगर, नेताजी नगर, नगर परिषद कॉलनी, भीमनगर, गणेश नगर, व्ही.आय.पी. कॉलनी, रशिद कॉलनी, ओंकार नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरातील शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक कॉलनी येथून सुरू झालेला मोर्चा बालाजी मंदिर मार्गे, सेलू कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जात महावितरण कार्यालयावर धडकला.
या मोर्चाचे नेतृत्व नगर परिषदेचे उपाध्यक्ष आलोक चौधरी आणि नगरसेविका चंद्रकला अनिल ढवळे यांनी केले. “नियमित वीज द्या”, “लो व्होल्टेज बंद करा”, “महावितरण हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी नागरिकांच्या वतीने महावितरणचे उपअभियंता यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वारंवार होणारे वीज खंडित होणे, पाणीपुरवठ्याच्या वेळी वीज जाणे, लो व्होल्टेज, डीपीवरील वाढता लोड या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात डीपीची क्षमता वाढवणे, नवीन डीपी बसवणे, एबी स्विचेस बसवणे, नवीन वीज खांब उभारणे, फ्युज कॉल सेवा पारदर्शक करणे तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, दीर्घकालीन उपाय म्हणून नवीन टाऊन फोर विद्युत लाईनला तात्काळ मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली.
नागरिकांनी इशारा दिला की, वारंवार सूचना देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने आता संयम सुटला असून तात्काळ सुधारणा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून समस्यांवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या निवेदनावर उपाध्यक्ष आलोक चौधरी, नगरसेविका चंद्रकला ढवळे यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







