एरंडोल (प्रतिनिधी) : दि. २८ एप्रिल २०२६ रोजी बीज प्रक्रिया केंद्र, महाबीज एरंडोल (जि. जळगाव) येथे महाबीजचा ५० वा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी, बीजोत्पादक व कृषी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजोत्पादक भागधारक श्री. भागवत विश्वनाथ पाटील होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुर्बान अरविंद तडवी, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी श्री. अभिषेक जमधडे, तालुका कृषी अधिकारी श्री. शिवदे, विभागीय व्यवस्थापक श्री. दर्शन कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक श्री. रविंद्र जोशी, वरिष्ठ केंद्र अभियंता श्री. आनंद खरात, तालुका निविष्ठा गुण नियंत्रण अधिकारी श्री. निखिल टोळकर, कृषी अधिकारी श्री. अनिल पाटील यांच्यासह विविध विक्रेते व बीजोत्पादक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक श्री. जोशी यांनी केले. श्री. तडवी यांनी बीजोत्पादनातून तयार होणाऱ्या दर्जेदार बियाण्यांचे महत्त्व स्पष्ट केले. विभागीय व्यवस्थापक श्री. कान्हेड यांनी बियाणे महामंडळाचे कार्य, महत्त्व आणि जैविक उत्पादनांविषयी माहिती दिली. तर श्री. जमधडे यांनी बियाणे प्रमाणीकरण प्रक्रिया व प्लॉट व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले. बीजोत्पादक श्री. निंबा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात बियाणे महामंडळाची भूमिका अधोरेखित केली.
यावेळी खरीप २०२५ व रब्बी २०२५-२६ हंगामात दर्जेदार बियाणे उत्पादन करणाऱ्या बीजोत्पादकांचा तसेच उत्कृष्ट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान कनिष्ठ प्रक्रिया सहायक श्री. मनिष दोंदे यांनी वर्धापनदिनानिमित्त कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल भदाणे यांनी केले तर आभारप्रदर्शन कृषी क्षेत्र अधिकारी सौ. अनिता ठाकरे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबीज जळगाव व बीज प्रक्रिया केंद्र एरंडोल येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.






