जामखेड (प्रतिनिधी) : तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जामखेड तालुक्यातील खर्डा रोडवर एका वृद्धेची प्रकृती अचानक बिघडली. मात्र पत्रकार श्वेता गायकवाड व डॉ. लाड यांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला.
२ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता साकत (ता. जामखेड) येथील सरुबाई पूलवळे (वय ७०) या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून भूम तालुक्यातील वरूड गावाहून साकत गावी (खर्डा मार्गे) जात होत्या. खर्डा-भूम रोडवरील किल्ला परिसरात अचानक त्यांना चक्कर आली, त्या खाली पडल्या आणि उलट्या होऊ लागल्या. काही वेळ त्या बेशुद्धही झाल्या.
याच वेळी पत्रकार श्वेता गायकवाड यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ डॉ. लाड यांना संपर्क साधून ॲम्बुलन्स बोलावली. डॉ. लाड यांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धेची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. त्यांना लिंबूपाणी देण्यात आले आणि उष्माघाताचे निदान करण्यात आले.
डॉ. लाड यांनी सांगितले की, “सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि शक्यतो सकाळी किंवा सायंकाळीच बाहेर पडणे आवश्यक आहे.”
या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी डॉक्टर व पत्रकारांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.






